टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शुक्रवारी (११ ऑक्टोबर) तेलंगणा पोलिसात पोलिस उपअधीक्षक (DSP) पदाची सूत्रे स्वीकारली. तेलंगणा पोलिसांनी सिराजबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पण नंतर ती हटवण्यात आली.
सिराज हे पद स्विकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सिराजने अनेक मोठ्या प्रसंगी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे त्याला हे पद देण्यात आले आहे. २०२४ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सिराजचे कौतुकही झाले होते.
वास्तविक, टी-20 वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सिराजला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता सिराज याला तेलंगणा पोलिसात डीएसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांने या पदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
मात्र, याचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही. सिराज अजूनही टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
सिराजला नोकरीसह जमीन देण्याचे आश्वासनही दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिराजला हैदराबादमध्ये घरासाठी जमीनही देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या T20 विश्वचषकात तेलंगणचा सिराज एकमेव क्रिकेटर होता. तो भारतीय संघाचाही महत्त्वाचा भाग होता. सिराज अजूनही टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत आहे.
मोहम्मद सिराज याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने टीम इंडियासाठी २९ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत ७८ विकेट्स घेतल्या आहेत. सिराजची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १५ धावांत ६ विकेट्स घेणे आहे. त्याने भारतासाठी ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७१ विकेट घेतल्या आहेत. सिराजने १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. यामध्ये १४ विकेट घेतल्या.
सिराजच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. यासोबतच मेहनतीच्या जोरावर पुढे आला आहे. सिराजने पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. त्याने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली आहे.
संबंधित बातम्या