वर्ष २०२४ हे भारतीय क्रिकेटसाठी चढ-उतारांनी भरलेले राहिले. या वर्षात टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला. तर अनेक खेळाडूंनी निवृत्तीही जाहीर केली. टीम इंडियाच्या एकूण ६ खेळाडूंनी २०२४ मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. या यादीत रविचंद्रन अश्विनसोबत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे.
विराट, रोहित आणि रवींद्र जडेजा यांनी T20 विश्वचषक २०२४ नंतर टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतली.
तर २०२४ च्या या वर्षाच्या शेवटी टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अश्विन आता भारताकडून खेळताना दिसणार नाही. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो नक्कीच खेळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटीनंतर अश्विनने हा निर्णय घेतला.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद पटकावले. यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा आणि विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोघांसह जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला. या तिन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी अनेकदा मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या.
शिखर धवन हा टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आहे. या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. धवनने २४ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली होती. त्याने भारतासाठी १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ धावा केल्या आहेत.
तसेच, त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये २३१५ धावा केल्या आहेत. धवननंतर कार्तिकनेही निवृत्ती जाहीर केली. १ जून रोजी कार्तिकने निवृत्ती जाहीर केली. कार्तिकने भारतासाठी ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७५२ धावा केल्या आहेत. त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये १०२५ धावा केल्या आहेत.