टी-20 वर्ल्डकप २०२४ चा विजेता टीम इंडियाची आज (४ जुलै) मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. मुंबईतील नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या या मिरवणुकीत लाखो चाहत्यांचा जनसागर सहभागी झाला होता. ओपन बसधील आपल्या आवडत्या खेळाडूची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
या दरम्यान, एक चाहता अक्षरश: झाडावर चढून बसलेला दिसला. खेळाडूंनी भरलेली ओपन बस एक झाडाजवळून जात असताना मोबाईल टॉर्चचा प्रकाश दिसला. यावेळी झाडाच्या फांदीवर आडवा झोपलेला चाहता टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपू लागला. हा 'क्रेझी' चाहता पाहून भारतीय खेळाडूंना हसू आवरता आले नाही.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथून सायंकाळी ५ वाजता विजयी मिरवणूक निघणार होती आणि सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर संपणार होती, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उशिराने येथे पोहोचला. ही विजयी मिरवणूक पाहण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी मरीन ड्राइव्हवर पोहोचले होते.
भारतीय संघ बार्बाडोसहून सकाळी ६ वाजता नवी दिल्लीला पोहोचला आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी ३.४२ वाजताच संघ मुंबईला रवाना होऊ शकला. वानखेडे स्टेडियम चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आणि काही मिनिटांतच स्टेडियम खचाखच भरले. सायंकाळी पाचच्या सुमारास स्टेडियमचे दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे बरेच चाहते बाहेर थांबले होते.
भारतीय संघ विस्तारा विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर पोहोचला. या ठिकाणी विमानाला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आला.
अधूनमधून पडणारा पाऊस, कमालीची आर्द्रता आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोकांचे आगमन यामुळे वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्यात आले. जे वानखेडेच्या आत पोहोचण्यात यशस्वी झाले ते अन्न आणि पाणी नसतानाही आपल्या जागेवर बसून राहिले. पाऊस असूनही एकाही चाहत्याने आपली जागा सोडली नाही. दरम्यान, डीजेने सर्व प्रकारच्या गाण्यांनी मनोरंजन केले आणि एका क्षणी वानखेडेमध्ये रेन-डान्स पार्टी सुरू असल्याचा भास झाला.
संबंधित बातम्या