टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला १ जुलैपासून नवे प्रशिक्षक लाभणार आहेत.
बीसीसीआयने सोमवारी (१३ मे) साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. बोर्डाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ मे २०२४ निश्चित केली आहे. "निवड प्रक्रियेत अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि निवडलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन समाविष्ट असेल," असे बोर्डाने एका म्हटले आहे.
निवडलेले नवे प्रशिक्षक १ जुलैपासून अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर लगेचच संघाची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२७ रोजी संपेल. बीसीसीआयने या पदासाठी अनेक अटीही घातल्या आहेत.
या अटींनुसार अर्जदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच, त्याने कमीत कमी ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळलेले असावेत आणि अर्जदाराला पूर्ण-सदस्यीय कसोटी देशात समान भूमिका बजावण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, जर द्रविडला टी-20 विश्वचषकानंतर पदावर राहायचे असेल तर त्याला पुन्हा अर्ज करावा लागेल, परंतु ३.५ वर्षांच्या प्रस्तावित कार्यकाळामुळे द्रविडला पुन्हा अर्ज करणे कठीण होईल कारण नोव्हेंबर २०२१ पूर्वीपासूनच द्रविड या भूमिकेत काम करत आहे.
विशेष म्हणजे राहुल द्रविड यांचा २ वर्षांचा करार गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात येणार होता, परंतु भारताच्या दक्षिण आफ्रिका दौरा आणि अमेरिकेतील टी-20 विश्वचषकापूर्वी हा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.
संबंधित बातम्या