आयसीसीने मंगळवारी (२५ डिसेंबर) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीला कराची येथे होणार असून अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.
आठ संघांच्या या स्पर्धेत १५ सामने होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. विशेष म्हणजे आयसीसीचा हा मेगा इव्हेंट ८ वर्षांनंतर आयोजित केला जात आहे.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला २३ फेब्रुवारीला दुबईत खेळवला जाणार आहे.
अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे, ते जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण ५ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने ३ तर भारतीय संघाने २ सामने जिंकले आहेत. २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमनेसामने आले होते. हा सामना पाकिस्तानने ३ विकेटने जिंकला होता.
यानंतर २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताचा ५४ धावांनी पराभव केला होता. तर २०१३ मध्ये, भारतीय संघाने या स्पर्धेत पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला आणि सामना ८ गडी राखून जिंकला. २०१७ च्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा १२४ धावांनी पराभव केला होता. पण यानंतर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला.
२००४ चॅम्पियन्स ट्रॉफी - पाकिस्तान ३ विकेट्सनी विजयी
२००९ चॅम्पियन्स ट्रॉफी, पाकिस्तान ५४ धावांनी विजयी
२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, भारत ८ विकेट्सनी विजयी
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, भारत १२४ धावांनी विजयी
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, पाकिस्तान १८० धावांनी विजयी
संबंधित बातम्या