बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीच्या नावावर होत्या. मात्र या यादीत शमीचे नाव नव्हते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे.
पण रणजी ट्रॉफीमध्ये पश्चिम बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी दाखवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मोहम्मद शमीचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्याच्या योजनेवर विचार करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
पण त्याआधी मोहम्मद शमी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीत खेळणार आहे. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी बीसीसीआयने मोहम्मद शमीचा बंगाल संघात समावेश केला आहे. बंगालचा पहिला सामना पंजाबशी होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामुळे शमी पहिल्या कसोटीचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीचे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पुनरागमन मालिकेच्या उत्तरार्धात होऊ शकते. बीसीसीआय वैद्यकीय संघ आणि निवडकर्त्यांना आणखी काही स्पर्धात्मक सामने खेळून मोहम्मद शमीच्या फिटनेसचे मूल्यांकन करायचे आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील कामगिरीच्या आधारावर शमीचा भारतीय संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
रणजी ट्रॉफीतील शानदार सामन्यानंतर शमीचा भारतीय संघात समावेश करण्याचा धोका निवड समितीला घ्यायचा नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला दीर्घ पुनर्वसन कार्यक्रमाला सामोरे जावे लागले. यामुळेच निवडकर्त्यांना लाल चेंडूसोबतचं पांढऱ्या चेंडूतही शमीचा फिटनेस पाहायचा आहे. मात्र, रणजीमधील त्याच्या कामगिरीने तो त्याच्या फॉर्ममध्ये परतल्याचे सिद्ध झाले आहे.
सुदीप कुमार घारामी (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, करण लाल, हृतिक चॅटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, शाकीर हबीब गांधी (यष्टीरक्षक), रणज्योत सिंग खैरा, प्रेयस रे बर्मन, अग्नि पनवी (विकेटकीपर), प्रदीप्ता प्रामाणिक, सक्षम चौधरी, मोहम्मद शमी, इशान पोरेल, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल, सायन घोष, कनिष्क सेठ आणि सौम्यदीप मंडल.
संबंधित बातम्या