इमर्जिंग आशिया चषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाचा २० धावांनी धुव्वा उडवला आणि स्पर्धेतून बाहेर फेकले. सेमी फायनल सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना २०६ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, पण प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद १८६ धावाच करू शकला.
भारताकडून रमणदीप सिंगने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारत ६४ धावांची तुफानी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. रमणदीप सिंग याच्याशिवाय टीम इंडियाचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
अफगाणिस्तानकडून अल्लाह गझनफर याने १४ धावात २ गडी बाद केले. तसेच, अब्दुल रहमान यानेही दोन फलंदाज बाद केले.
यानंतर अफगाणिस्तानचा अ संघ फायनलमध्ये श्रीलंका अ संघाला भिडणार आहे. इमर्जिंग आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी (२७ ऑक्टोबर) होणार आहे.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अकबरीने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर अटलने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
अकबरीने या सामन्यात ४१ चेंडूत ६४ धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला. अकबरी आणि अटल यांच्यात पहिल्या विकेटसाठी १२ षटकात १३७ धावांची भागीदारी झाली. तर सेदिकुल्लाह अटलने ५२ चेंडूत ८३ धावा केल्या. तर भारताकडून रसीख सलामने ३ आणि आकिब खानने १ बळी घेतला.
भारत अ- प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसीख दार सलाम, आकिब खान
अफगाणिस्तान अ- सेदीकुल्लाह अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी.
संबंधित बातम्या