WTC Final 2025 Equation For Indian Team : मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ चा मार्ग अधिक कठीण झाला आहे.
मेलबर्न टेस्ट हरल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुसरा कोणता संघ पोहोचणार हा प्रश्न आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर आता WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळली जाणारी कसोटी जिंकावी लागेल. टीम इंडिया सिडनीमध्ये WTC २०२४-२५ सायकलचा शेवटचा सामना खेळणार आहे, ज्यामध्ये जिंकणे अनिवार्य असेल.
मेलबर्न कसोटी विजयाने ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी ६१.४५ झाली आहे. त्यांचे WTC गुणतालिकेत दुसरे स्थान कायम असून अंतिम फेरीसाठी मजबूत दावा केला आहे.
ऑस्ट्रेलियाला आता एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्के होईल. ऑस्ट्रेलियाला आता तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी १ सामना भारताशी आणि दोन सामने श्रीलंकेशी खेळायचे आहेत.
यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की अंतिम फेरीत धडक मारेल. दुसरीकडे, टीम इंडियाचे पराभवामुळे नुकसान झाले आहे. गुणतालिकेत टीम इंडिया ५३.२७ विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानवार आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकला तरी सर्वस्वी श्रीलंका ऑस्ट्रेलिया मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या