रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये प्रवेश केला असून आता विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर फायनलध्ये प्रवेश करू शकली आहे.
बरं, जर आपण फक्त आयसीसी स्पर्धांवर नजर टाकली तर, नियमितपणे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचूनही भारत ट्रॉफीपासून खूप दूर राहिला आहे.
भारताने गेल्या १० वर्षात ५ वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत या आकडेवारीवरून असे दिसून येते की खरे चोकर्स दक्षिण आफ्रिका नसून टीम इंडिया आहे.
आयसीसी स्पर्धेत भारताचा शेवटचा विजय २०१३ मध्ये आला होता, जेव्हा धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला होता.
त्याआधी २ वर्षांपूर्वी टीम इंडियाने २०११ च्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कपवरही कब्जा केला होता. या दुहेरी यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती, पण आता त्या गोष्टींना १० वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे आणि भारत अजूनही आयसीसी ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या १० वर्षांपासून भारत प्रत्येक वेळी विश्वचषकाच्या जेतेपदाचा प्रमुख दावेदार असतो. पण प्रत्येकवेळी ते चाहत्यांची निराशा करतात.. टीम इंडिया २०१४ च्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून ६ गडी राखून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१६, २०२१ आणि २०२२ च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला निराशेचा सामना करावा लागला. २०१६ आणि २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली होती.
२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतासमोर २०१५ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आव्हान होते. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थान पटकावत पुढची फेरी गाठली. पण उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतही भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता आणि यावेळी त्यांना पराभूत करणारा संघ न्यूझीलंड होता. भारताने २०२३च्या विश्वचषकात आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती, मात्र विजेतेपदाच्या लढतीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे केवळ २ अंतिम सामने खेळले गेले आहेत. भारत २०२१ मध्ये न्यूझीलंडसोबत पहिला फायनल खेळला होता, पण न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव झाल्यामुळे भारत इतिहास रचण्यापासून वंचित राहिला.
दोन वर्षांनंतर, भारतीय संघाने २०२३ WTC फायनलमध्येही प्रवेश केला आणि यावेळी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. भारतीय संघाचे नशीब इतके खराब होते की यावेळी ऑस्ट्रेलियाने त्यांचा २०९ धावांनी पराभव केला.
दरम्यान, २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफीची कामगिरीही भारतासाठी संस्मरणीय ठरली. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करत बाद फेरी गाठली. अंतिम फेरीत पाकिस्तानशी सामना झाला तेव्हा भारताला १८० धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
२०१४ - फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव (टी-20 वर्ल्डकप)
२०१५ - वनडे विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव
२०१६ - T20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभव
२०१७ - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव
२०१९ - वनडे विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पराभव
२०२१ - WTC च्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव
२०२१ - T20 विश्वचषक स्पर्धेत गट टप्प्यातून बाहेर
२०२२ - T20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव
२०२३ - WTC च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव
२०२३ - वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव
संबंधित बातम्या