भारत आणि पाकिस्तानचे संघ कोणत्याही खेळात आमनेसामने येतात तेव्हा जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा या सामन्यांवर खिळलेल्या असतात. आणि जेव्हा क्रिकेटचा सामना असतो, तेव्हा तर चुरस आणखीनच रोमांचक होते.
या वर्षी न्यूयॉर्कमध्ये टी-20 वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बद्दल बोलत आहोत. तर नाही, भारत आणि पाकिस्तान पुढच्या वर्षी नव्हे तर पुढच्या महिन्यातच आमनेसामने येणार आहेत. या हॉंगकॉंग सिक्स क्रिकेट टुर्नामेंटसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
वास्तविक, पुढील महिन्यात हाँगकाँगमध्ये, हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघ आमनेसामने येतील. म्हणजेच १ नोव्हेंबर भारत-पाकिस्तान थरार रंगणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावर या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
रॉबिन उथप्पा टीम इंडियाचा कर्णधार
भारताने या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाची कमान २००७ मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला फलंदाज रॉबिन उथप्पाकडे सोपवण्यात आली आहे.
उथप्पाशिवाय आणखी ६ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भरत चिपली, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी आणि स्टुअर्ट बिन्नी यांचा समावेश आहे.
हाँगकाँग क्रिकेट सिक्स टूर्नामेंटसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे : रॉबिन उथप्पा (कर्णधार), भरत चिपली, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी.
संबंधित बातम्या