Champions Trophy 2025 Final IND vs NZ : रोहित शर्मा याचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानेही चांगली कामगिरी केली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ४ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
मात्र आता रोहितच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ टीम इंडियामध्ये मोठे बदल करू शकते.
टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत आहे. येथे त्याचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी दुबईत होणार आहे. कर्णधार म्हणून रोहितसाठी हा शेवटचा सामना ठरू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करेल. रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही तो वनडे आणि कसोटीत खेळू शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधारपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर यासंदर्भात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बोर्डाची बैठकही झाली. मात्र या मुद्द्यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
केंद्रीय कराराबाबत बोर्ड लवकरच अपडेट देऊ शकेल. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे बीसीसीआयच्या A+ श्रेणीत आहेत. बोर्ड अक्षर पटेल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना बढती देऊ शकते. श्रेयस अय्यर करारानुसार परत येऊ शकतो.
संबंधित बातम्या