IND vs ENG ODI Series: इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली असली, तरी पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी क्रम पाहायला मिळाली, त्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सलामीपासून खालच्या फळीपर्यंत फलंदाजी क्रमात बराच बदल झाला. याबाबत मुख्य प्रशिक्षक म्हणतात की, त्यांना लवचिकतेची गरज आहे, पण १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर हे केएल राहुलसोबत जे काही करत आहेत, ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे, परंतु मला वाटते की, केएल राहुलसाठी हे खूप दुर्दैवी आहे. अक्षर पटेल ३० आणि ४० धावा करत आहे, पण केएल राहुलसोबत जे केले जात आहे, ते योग्य नाही. त्याचा रेकॉर्ड बघा, त्याने पाचव्या क्रमांकावर चमकदार कामगिरी केली आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या क्रमवारीबद्दल काय विचार करत आहे? हे मला माहित नाही. जर त्याने सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर तो ६ किंवा ७ धावा करेल. हे अन्यायकारक आहे’, असे के श्रीकांत म्हणाले.
‘केएल राहुलच्या जागी अक्षर पटेलला खेळवण्याचा भारतीय प्रशिक्षकांनी घेतलेला निर्णय योग्य नाही. गंभीर जे करत आहेत, ते योग्य नाही. परिस्थितीनुसार अक्षरला पाचव्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. परंतु ती सुसंगत रणनीती असू शकत नाही. संघात असेच बदल होत गेले तर, तर काय होईल? हे त्यांना माहिती आहे. एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात सर्व काही बिघडेल’, अशी भिती के श्रीकांत यांनी व्यक्त केली.
पुढे श्रीकांत म्हणाले की, ‘डाव्या-उजव्या हाताच्या कॉम्बिनेशनबद्दल बोलून तुम्ही त्याचे औचित्य सिद्ध करू शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला पहिल्या चारमधील डाव्या- उजव्या जोडीची पर्वा नाही का? फक्त पाचव्या क्रमांकावरच फरक का पडतो? अक्षर पटेलसोबत मला कोणतीही अडचण नाही, तो त्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहे. परंतु जर तुम्ही राहुलला खालच्या क्रमावर आणत असाल तर, ऋषभ पंतला सहाव्या क्रमांकावर खेळवा. राहुलचा आत्मविश्वास का कमी झाला? जागतिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी हे योग्य आहे का?’ असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या