Rajkot Test, India Vs England 3rd Test : टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली आहे. भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांत गारद झाला.
हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर भारताने मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. विशाखापट्टणमनंतर आता टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली. यानंतर टीम इंडिया या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.
विशेष म्हणजे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. सामन्यानंतर जेव्हा बेन स्टोक्स पत्रकार परिषदेत आला तेव्हा, तो खूपच निराश दिसत होता. त्याचा चेहरा शरमेने झुकलेला होता. तसेच, त्याच्या तोंडातून शब्दही स्पष्ट निघत नव्हते.
स्टोक्स यावेळी संपूर्ण संघात चिडलेला दिसला. त्याला पराभवाची कारणे विचारली असता, त्याने १-२ नव्हे तर संपूर्ण संघावर हल्लाबोल केला.
तो म्हणाला की, बेन डकेटने जबरदस्त खेळी खेळली. आम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसावे अशी त्याची इच्छा होती, परंतु कधीकधी प्लॅन काम करत नाही. कालच आम्हाला भारताचा डाव संपवायचा होता, पण तसे झाले नाही.
भारताने पहिल्या डावात ४४५ धावा आणि दुसऱ्या डावात ४ बाद ४३० धावा केल्या. म्हणजेच इंग्लंडच्या गोलंदाजांनी खूपच खराब गोलंदाजी केली. इंग्लिश गोलंदाजांबाबत बोलताना कर्णधार स्टोक्स म्हणाला की, आता चुका ओळखून त्या सुधारण्याची गरज आहे. कधीकधी गेमप्लॅन काम करत नाहीत आणि आमच्या बाबतीत हेच घडले.'
या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्माने १३१ आणि रविंद्र जडेजाने ११२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावा केल्या. इंग्लंड ३१९ धावांत गारद झाल्यानंतर भारताला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली.
यानंतर भारताने आपला दुसरा डाव दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २१४ धावांची खेळी केली. अशाप्रकारे पहिल्या डावातील आघाडी आणि दुसऱ्या डावातील ४३० धावा मिळून इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३९.५ षटकात १२२ धावांवर गारद झाला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेाने ५ बळी घेतले. जडेजाने १२.४ षटकांत ४१ धावा दिल्या. कुलदीपला २ बळी मिळाले. या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या