टीम इंडियाने पिंक बॉलने खेळला गेलेला डे नाईट सराव सामना जिंकला आहे. आज रविवारी भारतीय संघाने पंतप्रधान इलेव्हन संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने चमक दाखवत ४ विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने २ बळी घेतले. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी हा अप्रतिम विजय होता.
भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ५९ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली.
दरम्यान, केएल राहुल (२७) रिटायर हर्ट झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने जयस्वालसोबत डावाची धुरा सांभाळली. १७व्या षटकात चार्ली अँडरसनने यशस्वी जयस्वालला (४५) बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ ३ धावांवर बाद झाला.
शुभमन गिल (नाबाद ५०) रिटायर हर्ट झाला. नितीश कुमार रेड्डी (४२) यांनी सर्वाधिक धावा केल्या. रवींद्र जडेजा (२७) आणि सरफराज खान (१) धावांवर बाद झाले. वॉशिंग्टन सुंदर (३७) आणि देवदत्त पडिक्कल (३) नाबाद राहिले. भारताने ४६ षटकांत ५ गडी गमावून ३५६ धावा केल्या. या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसाच्या शेवटी भारताला विजयी घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी, जॅक एडवर्ड्स याच्या नेतृत्वाखालील प्राइम मिनिस्टर इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. यादरम्यान सॅम कोन्स्टासने शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूंचा सामना करत १०७ धावा केल्या. जॅक क्लेटनने ४० धावांची खेळी केली. कर्णधार एडवर्ड्स अवघ्या १ धावा करून बाद झाला.
यानंतर पंतप्रधान इलेव्हनने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्स गमावून सामना जिंकला.
संबंधित बातम्या