टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयानंतर हेड कोच गौतम गंभीर प्रचंड खुश दिसत आहे. आता गंभीरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
टीम इंडियाने पहिला सामना ७ गडी राखून, दुसरा सामना ८६ धावांनी आणि आता हैदराबादमधील तिसरा सामना १३३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २९७ धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती.
बांगलादेशवर भारताच्या ऐतिहासिक ३-० मालिका विजयानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “A tour de force!.” या अर्थ आम्ही सर्वोत्तम कौशल्याच्या बळावर आणखी एक यश मिळवले आहे.
दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने अभिषेक शर्माची विकेट लवकर गमावली होती. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात १७३ धावांची संस्मरणीय भागीदारी झाली. सॅमसनने या सामन्यात ४० चेंडूत शतक पूर्ण केले होते.
एकीकडे संजू सॅमसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ४७ चेंडूत १११ धावा केल्या, तर सूर्यकुमारने ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३५ चेंडूत ७५ धावांची झटपट खेळी खेळली. या सामन्यात भारत टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा देश बनला आहे. या यादीत सर्वात वरच्या स्थानावर नेपाळ आहे, ज्याने मंगोलियाविरुद्ध ३१४ धावा केल्या आहेत, तर टीम इंडियाने २९७ धावा केल्या होत्या.
श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरने प्रथमच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी टीम इंडियाने टी-20 मालिकेत ३-० ने विजय मिळवला होता आणि एकदिवसीय मालिकेत २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी त्यांनी बांगलादेशचा कसोटी मालिकेत २-० असा पराभव केला होता.
संबंधित बातम्या