T20 World Cup 2024: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने येत्या १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. मात्र, हार्दिक पांड्याच्या निवडीवर चाहते सर्वाधिक नाराज आहेत. आयपीएल २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यानंतरही त्याची भारतीय टी-२० विश्वचषकात उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने चाहते भडकले आहेत.
आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिककडे सोपवण्यात आली. मात्र, या हंगामात त्याने अत्यंत खराब कामगिरी केली. या स्पर्धेत हार्दिक पांड्याने नऊ सामन्यात ५६.७५ च्या सरासरीने २२७ धावा केल्या. तर, फक्त चार विकेट्स घेतले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला नऊ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. मात्र, त्यानंतरही बीसीसीआयने हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवले. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
२०२२ विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याने ६ सामन्यात केवळ २५.६ च्या सरासरीने १२८ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत ८ विकेट्स घेतले. पण पूर्वीच्या तुलनेत हार्दिकचा फॉर्म खूपच घसरला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून त्याने भारताकडून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. आयपीएल २०२४ मध्ये त्यानेआतापर्यंत सुमारे १२ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
हार्दिक पांड्याकडे भारतीय टी-२० विश्वचषक २०२४ संघाचे उपकर्णधारपद सोपवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न एका जणाने उपस्थित केला आहे. दुसरा व्यक्तीने म्हटले आहे की, अगदी शून्य कामगिरी असूनही बीसीसीआयने हार्दिकला उपकर्णधारपदाची भेट दिली. भारताने विश्वचषक गमावला तर त्याला हार्दिक पांड्या जबाबदार असेल, असा दावा एका व्यक्तीने केला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
संबंधित बातम्या