भारतीय क्रिकेट संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. तब्बल दशकभरानंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली.
ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकून मालिका ३-१ ने जिंकली. या मालिकेत भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली सुपर फ्लॉप ठरले.
दोन्ही खेळाडू आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले. मात्र, गोलंदाजीत जसप्रीत बुमराह याने जे केले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. बुमराह वन मॅन आर्मीप्रमाणे लढत होता. त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दुबळे दिसत होते. मात्र, जसप्रीत बुमराहने या दौऱ्यात इतकी गोलंदाजी केली की सिडनीला पोहोचेपर्यंत तो दुखापतग्रस्त झाला.
होय, जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर मैदान सोडावे लागले आणि पहिल्या डावात स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात जावे लागले. त्यानंतर संपूर्ण सामन्यात बुमराहने गोलंदाजी केली नाही. दुसऱ्या डावात तो नक्कीच फलंदाजीला आला, पण गोलंदाजी करू शकला नाही.
बुमराहचा सहकारी प्रसिध कृष्णा याने दुखापतीबद्दल बोलताना त्याला पाठीची दुखापत झाल्याचे सांगितले होते.
यानंतर आता भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग देखील जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण पाहून प्रचंड संतापला आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक मोठं विधान केलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडवर हरभजन सिंग म्हणाला, 'बुमराहला उसातून रस काढावा तसे पिळून काढले आहे. कोणताही फलंदाज असो, चेंडू बुमराहला द्या. ट्रॅव्हिस हेड आला तर बुमराहला चेंडू द्या, मार्नस आला तर बुमराहला चेंडू द्या, स्टीव्ह स्मिथ आला तर बुमराहला चेंडू द्या. अखेर तो किती ओव्हर टाकणार?
त्याची पाठ मोडली आहे.' या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहने ५ सामन्यात एकूण १५१ षटके टाकली आहेत. संपूर्ण मालिकेत त्याने ९०८ चेंडू टाकले आणि सर्वाधिक ३२ बळी घेतले.
संबंधित बातम्या