Gulbadin Naib Jonathan trott : टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८ धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाय अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला स्पर्धेतून बाहेर काढले.
किंग्सटाउनच्य अर्नोस व्हॅले ग्राउंडवर झालेला हा सामना अनेक वर्षे स्मरणात राहील. रोलर कोस्टरप्रमाणे चढ-उतारांनी भरलेला सामना कधी बांगलादेशकडे तर कधी अफगाणिस्तानच्या पारड्यात झुकलेला वाटायचा. लो स्कोअरिंग गेम, पावसाचा अडथळा आणि डकवर्थ लुईसचा नियम यामुळे सामन्याचा थरार शेवटपर्यंत टिकून होता.
पण सामन्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुलबदिन नायब आणि प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांच्यावर अप्रामाणिकपणाचा आरोप होत आहे.
वास्तविक, सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस व्हॅले मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वारंवार पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. १२व्या षटकात पुन्हा पाऊस सुरू झाला तेव्हा डगआउटमध्ये उपस्थित असलेले अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना खेळ स्लो करण्याच्या सूचना दिल्या.
विशेष म्हणजे यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नायबने हॅमस्ट्रिंगचे नाटक करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात कॅमेरा त्याच्यावर गेला आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा भांडाफोड झाला.
गुलबदीनने नाटक सुरू केल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला. यानंतर खेळ थांबला आणि मैदानावरील कर्मचारी मैदान झाकण्यासाठी धावले. त्यावेळी अफगाणिस्तानचा संघ डकर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी पुढे होता.
खराब हवामानामुळे सामना पुन्हा सुरू झाला नसता तर अफगाणिस्तानला विजेता घोषित केले असते. डकर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा विजय रोखण्यासाठी गुलबदिन नायबने हे कृत्य केल्याचा आरोप सोशल मीडियावरील यूजर्स करत आहेत.
विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या दोन महिन्यांपूर्वीच ब्रायन लाराने अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण आता राशीद खानने ब्रायन लाराचे शब्द खरे करून दाखवले आहेत.
अफगाणिस्तानने सेमी फायनल गाठताच काबुल आणि देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार राशीद खान म्हणाला की, “ आमचे वेगवान गोलंदाज नवीनुल हक आणि फजलहक फारुकी यांनी संपूर्ण स्पर्धेत नवीन चेंडूसह चमकदार कामगिरी केली. पावसामुळे अनेकवेळा खेळ थांबला, त्यामुळे निकाल येण्यास बराच वेळ लागला. पण अफगाणिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल. ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही अशी कामगिरी अंडर-१९ स्तरावर केली आहे, परंतु या स्तरावर नाही. देशात काय वातावरण असेल हे मी वर्णन करू शकत नाही. हा आनंद देशवासियांना देण्यासाठी आम्हाला कोणत्याही किंमतीत उपांत्य फेरी गाठायची होती”.
संबंधित बातम्या