गौतम गंभीर हा आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्स लीग टप्प्यात अव्वल आहे आणि चौथ्यांदा आयपीएल फायनल खेळण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. गौतम गंभीर कर्णधार असताना त्याने केकेआरला २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनवले होते.
गौतम गंभीरने केवळ आयपीएलमध्येच नाही तर भारतीय क्रिकेटमध्येही मोठे योगदान दिले आहे. २००७ टी-20 विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
तथापि, रविचंद्रन अश्विनसोबतच्या एका चॅट शोमध्ये गौतम गंभीरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि वयोगटातील क्रिकेटमध्ये आलेल्या संघर्षांबद्दल सांगितले आहे.
गौतम गंभीरने वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्याशी भेदभाव कसा केला गेला हे उघड केले. तो म्हणतो, 'मी कदाचित १२ किंवा १३ वर्षांचा होतोे, जेव्हा मी प्रथमच अंडर-१४ स्पर्धेसाठी प्रयत्न केला, तेव्हा मी निवडकर्त्याच्या पाया पडलो नाही, त्यामुळे माझी निवड झाली नाही. तेव्हापासून मी स्वतःला वचन दिले की मी कधीही कोणाच्या पायाला हात लावणार नाही आणि मी कधीही कोणाला माझ्या पायाला हात लावू देणार नाही.
गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा जेव्हा त्याला अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख केला जातो. तो म्हणाला, 'मला आठवते की जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत अपयशी ठरलो, मग ते अंडर-१६, अंडर-१९, रणजी ट्रॉफी असो किंवा माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात असो. लोक म्हणायचे की तु श्रीमंत कुटुंबातून आला आहेस, तुला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. तुझ्याकडे बरेच पर्याय आहेत, तु तुझ्या वडिलांच्या बिझनेस सांभाळ. हे टोमणे मला कायम ऐकायला मिळतात. त्यानंतर मी लोकांच्या या सर्व धारणांचा पराभव करायचे ठरवले. तो मी करू शकलो."
गंभीर ने मार्च २०१९ मध्ये निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ५८ कसोटी, १४७ वनडे आणि ३७ टी-२० सामने खेळून निवृत्ती घेतली.
गंभीरच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५,००० पेक्षा जास्त आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४१.९५ च्या सरासरीने ९ शतके आणि २२ अर्धशतकांसह ४१५४ धावा केल्या आहेत.
वनडेत गंभीरने ३९.६८ च्या सरासरीने ११ शतके आणि ३४ अर्धशतकांसह ५२३८ धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये गंभीरने ३७ सामन्यात ११९ च्या स्ट्राईक रेटने ५ अर्धशतकांसह ९३२ धावा केल्या आहेत.
२००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा गंभीर अविभाज्य भाग होता, त्याने उत्तरार्धात १२२ चेंडूत ९७ धावा केल्या आणि वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना लवकर गमावल्यानंतरही श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय लक्ष्याचा पाठलाग पुन्हा सुरू केला.
निवृत्तीनंतर गंभीर समालोचक म्हणून सक्रिय आहे. आयपीएलच्या २०२२ आणि २०२३ मोसमात तो लखनौ सुपर जायंट्ससाठी मार्गदर्शक होता. यावर्षी तो केकेआरमध्ये टीम मेंटॉर म्हणून परतला असून संघ साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला. मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
संबंधित बातम्या