गौतम गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेऊ शकणार नाही कारण...; माजी क्रिकेटपटूचे परखड बोल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गौतम गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेऊ शकणार नाही कारण...; माजी क्रिकेटपटूचे परखड बोल

गौतम गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेऊ शकणार नाही कारण...; माजी क्रिकेटपटूचे परखड बोल

Jul 11, 2024 01:25 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर हा राहुल द्रविड यांचं स्थान घेऊ शकणार नाही, असं परखड मत माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केलंय.

गौतम गंभीर द्रविडची जागा घेऊ शकणार नाही; त्याचा स्वभाव...; माजी क्रिकेटपटूचे परखड बोल
गौतम गंभीर द्रविडची जागा घेऊ शकणार नाही; त्याचा स्वभाव...; माजी क्रिकेटपटूचे परखड बोल

माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारतासह परदेशातील दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया येत आहेत. एक महत्त्वाची संधी मिळाल्याबद्दल सर्वांनीच गंभीरचं अभिनंदन केलं आहे. मात्र, त्याचवेळी काही क्रिकेटपटू गंभीरची तुलना माजी प्रशिक्षक राहुल द्रविडशी करत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी अत्यंत परखडपणे आपलं मत मांडलं आहे. गौतम गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

'राहुल द्रविड हा टीम इंडियासाठी वडीलधाऱ्याच्या भूमिकेत होता. गौतम गंभीरला ते स्थान मिळवणं कठीण जाईल. गंभीरचा स्वभाव रागीट आहे. त्यानं केकेआरचा कोच म्हणून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली असली तरी भारताचा प्रशिक्षक म्हणून त्याच्यापुढं मोठं आव्हान असेल, असं बासित अली म्हणाले.

गौतम गंभीर आगामी श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार असून तिथँ बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा होणार आहे. याकडं लक्ष वेधून बासित अली म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धच्या आगामी मालिकेत गौतम गंभीरपुढं फारसं आव्हान नसेल. भारतीय प्रशिक्षक म्हणून त्याची सर्वात मोठी कसोटी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात लागेल.

पद मिळवणं सोपं, त्याला न्याय देणं कठीण

'मुख्य प्रशिक्षक बनणं सोपं आहे, मात्र, त्याला न्याय देणं, ते पद टिकवणं मोठं कठीण आहे. गौतम गंभीर राहुल द्रविडसारखा पितृतुल्य बनू शकतो का? असं तुम्ही विचाराल तर आता माझं उत्तर नाही असं असेल. कारण त्याच्या स्वभावात राग आहे, राहुल द्रविड तसा नाही. राहुल द्रविडनं टीम इंडियामध्ये जे वातावरण निर्माण केलंय, ते टिकवून ठेवण्यात गंभीर यशस्वी होईल का हा प्रश्न आहे, असं बासित अली म्हणाले.

विराट-गंभीर संबंध

बासित अली यांनी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंधांकडंही लक्ष वेधलं. मात्र, 'जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा बाकी सर्व गोष्टी मागे राहतात, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी हार्दिक पंड्याचं उदाहरण दिलं. हार्दिक पंड्या जेव्हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, तेव्हा त्याच्यावर खूप टीका होत होती, पण टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो भारताकडून खेळताच परिस्थिती बदलली, अशी आठवण त्यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या