भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामनाही भारताने जिंकला. चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना जिंकून टीम इंडियाने ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्मा याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
तिलक वर्मा याने हेड कोच गौतम गंभीर याला त्याच्या मॅचविनिंग इनिंगचे श्रेय दिले. डावखुरा फलंदाज म्हणाला की, गौतम सरांनी मला जे करायला सांगितले होते, तेच मी केले.'
तिलक याच्या म्हणण्यानुसार, सामन्याच्या एक दिवस आधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने तिलकला त्याची संघातील भूमिका सांगितली होती. त्याचीच अंमलबजावणी तिलकने चेन्नईच्या खेळपट्टीवर केली, ज्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.
चेन्नईतील सामना संपल्यानंतर तिलक वर्माने सांगितले, की सामन्याच्या एक दिवस आधी गौतम सरांनी मला सांगितले होते की काहीही झाले तरी मला सामन्यातील परिस्थितीनुसार खेळायचे आहे. मला फ्लेक्सिबल असायला हवे.
म्हणजे, जर संघाला प्रति षटक १० धावांची गरज असेल तर मला त्यानुसार खेळावे लागेल आणि जर काही इतर परिस्थिती असेल तर मला त्यानुसार खेळावे लागेल.
तिलक वर्मासमोर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये परिस्थिती कधीही स्थिर नव्हती. सलामीची जोडी १५ धावांवर परतल्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलकला दुसऱ्या टोकाकडून फलंदाजांची साथ मिळताना दिसत नव्हती.
कारण ठराविक अंतराने विकेट्स पडत होत्या. पण, या सगळ्यात तिलक एका टोकाला उभा राहिला आणि स्कोअर बोर्ड पुढे सरकवत राहिला.
शेवटी तिलकने टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. त्याने ५५ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ७२ धावा केल्या.
संबंधित बातम्या