भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका ३-० ने जिंकली. दोन्ही संघांनी २० षटकात आपापल्या डावात प्रत्येकी १३७ धावा केल्या, त्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला फक्त २ धावा करू दिल्या. यानंतर भारताने सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपला विजय निश्चित केला.
पण या सामन्यात एकेकाळी श्रीलंकेला विजयासाठी ३० चेंडूत ३० धावा करायच्या होत्या, पण भारताच्या डेथ बॉलिंगने पुन्हा एकदा चमत्करा केला.
तत्पूर्वी, सामन्यात भारताने टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या. ज्यामध्ये शुभमन गिलने ३७ चेंडूत ३९ धावांची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याच्याशिवाय रियान परागने २६ आणि वॉशिंग्टन सुंदरने २५ धावांचे योगदान दिले.
टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अनुभवी संजू सॅमसन या सामन्यात काही खास दाखवू शकले नाहीत, तर यशस्वी जैस्वालही अवघ्या १० धावा करून बाद झाला.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.
निसांका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांनी कमान हाती घेतल्याने श्रीलंकन संघासाठी विजय सोपा दिसत होता. त्यांच्यातील ५२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते, पण १६व्या षटकात रवी बिश्नोईने कुसल मेंडिसची विकेट घेत टीम इंडियाच्या आशा जिवंत ठेवल्या. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वानिंदू हसरंगा आणि चारिथ असालंका यांना लागोपाठ दोन चेंडूत बाद करून दुहेरी धक्का दिला.
रिंकू सिंग हा फलंदाज आहे, पण त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीत जादू दाखवली. कारकिर्दीतील दुसऱ्याच चेंडूवर त्याने ४६ धावा करून खेळत असलेल्या कुसल परेराची विकेट घेतली. त्याच षटकात त्याने रमेश मेंडिसची विकेटही घेत भारताला सामन्यात परत आणले.
कर्णधार सूर्यकुमार यादवने डावाच्या १९व्या षटकाची जबाबदारी रिंकू सिंगकडे दिली होती. रिंकू गोलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेला विजयासाठी २ षटकात फक्त ९ धावांची गरज होती. रिंकूचे षटक सुरू होण्यापूर्वी श्रीलंका सहज जिंकेल असे वाटत होते, पण त्याने संपूर्ण खेळ फिरवला. रिंकूने या षटकात केवळ ३ धावा दिल्या आणि २ विकेट्सही घेतल्या.
रिंकूच्या षटकातील पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने कुसल परेराला झेलबाद केले. रिंकूने विकेट घेताच गंभीरच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम हास्य दिसले. गंभीरची ही प्रतिक्रिया वेगाने व्हायरल झाली.
दरम्यान, शेवटचे षटक सूर्यकुमार यादवने टाकले, ज्याला ६ चेंडूत ६ धावांचा बचाव करायचा होता. सूर्यकुमार यादवनेही लागोपाठ २ चेंडूत २ बळी घेतले, पण शेवटचा चेंडूवर सामना टाय झाला.
वॉशिंग्टन सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजीला आले होते. पहिल्या चेंडूवर २ धावा आल्या, मात्र दुसऱ्या चेंडूवर कुसल परेरा आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर पथुम निसांका झेलबाद झाले. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावा करायच्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या