Mum vs Vid Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्याच्या मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि विक्रमी ४२ व्यांदा चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला. धवल कुलकर्णीने उमेश यादवची शेवटची विकेट घेत मुंबईला चॅम्पियन बनवले.
विशेष म्हणजे, धवल कुलर्णीने या सामन्याआधीच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेल्या धवलने २००७ मध्ये पहिल्यांदा मुंबई प्रथम श्रेणी सामना खेळला आणि आज आपल्या १७ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप देताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सामन्यानंतर धवल चांगलाच भावूक झाला होता. यावेळी त्याचे सांत्वन करण्यासाठी, इतर खेळाडूंनी त्याला मिठी मारली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. मुंबईच्या खेळाडूंनी त्याला खांद्यावर घेऊन संस्मरणीय निरोप दिला.
सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत धवल कुलकर्णी म्हणाला की, मला गोलंदाजी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण तरीही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्याकडे चेंडू सोपवला.
अंतिम सामन्यात धवल कुलकर्णीने ४ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात ११ षटके टाकली, त्यापैकी ५ मेडन्स होती. त्याने पहिल्या डावात केवळ १५ धावांत ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने विदर्भाची शेवटची विकेट उमेश यादवला बाद करत मुंबईला चॅम्पियन बनवले.
धवल कुलकर्णीने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत ८६ सामने खेळले, ज्यात त्याने २६१ विकेट घेतल्या. याशिवाय त्याने फलंदाजीत १,७२१ धावांचे योगदान दिले. तर टीम इंडियासाठी धवलने १२ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने १९ विकेट घेतल्या. दुसरीकडे, तो भारतासाठी २ टी-20 सामनेही खेळला, ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप यश मिळवले आहे आणि आता आपल्या संघाला रणजी चॅम्पियन बनवल्यानंतर त्याने या खेळाचा निरोप घेतला आहे.
संबंधित बातम्या