महिला प्रीमियर लीग २०२४ ला आज नवा चॅम्पियन मिळणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगचा (WPL 2024 Final) अंतिम सामना आज (१७ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. आरसीबीचा महिला संघ पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. तर मेग लॅनिंगची दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे.
दरम्यान, आरसीबीच्या पुरूष संघ संघाला अद्याप एकही आयपीएल विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यांनी तीनदा आयपीएल खेळली आहे. पण त्यांना एकदाही विजय मिळवता आला नाही.
आता आरसीबीचा महिला संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. स्मृती मंधानाचा संघ खूप मजबूत असून विजेतेपदाचा दावेदारही आहे. अशा स्थितीत महिला संघ आरसीबीला पहिले-वहिले विजेतेपद मिळवून देऊ शकतो.
आरसीबीकडे एलिस पेरी, स्मृती मानधना आणि आशा शोभनासारखे खेळाडू आहेत. या तिघींनीही या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. एलिस पेरी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सध्या अव्वल स्थानावर आहे. तिने ८ सामन्यात ३१२ धावा केल्या आहेत. तर शोभनाने ९ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मंधाना सध्या पाचव्या स्थानावर आहे. तिने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. हे तीन खेळाडू अंतिम सामन्यात आरसीबीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये आरसीबीची कामगिरी निराशाजनक होती. मात्र यावेळी संघ जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून स्पर्धेत उतरला आणि दमदार कामगिरी करून दाखवली. RCB ने २०२३ च्या सीझनमध्ये ८ सामने खेळले आणि फक्त २ सामने जिंकले. त्यांना ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीने WPL 2024 मध्ये ८ सामने खेळले आणि ४ जिंकले. ४ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला.
विराट कोहलीची आरसीबी एकदाही चॅम्पियन बनू शकली नाही. मात्र आता महिला संघाकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत. पुरूष संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर ते तीनदा अंतिम फेरीत पोहोचले. पण तिन्ही वेळा त्यांचे विजेतेपद हुकले. RCB ने IPL २००९ मध्ये पहिल्यांदा आयपीएल फायनल खेळली. त्यावेळी त्यांचा हैदराबाद डेक्कन चार्जर्सविरुद्ध ६ धावांनी पराभव झाला.
यानंतर २०११च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. त्या सामन्यात सीएसकेने ५८ धावांनी विजय मिळवला. तर २०१६ च्या आयपीएल फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा धुव्वा उडवला. त्या सामन्यात आरसीबीला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संबंधित बातम्या