Gautam Gambhir Team India Coach : नवीन वर्षाची सुरुवात होताच टीम इंडियात बदलांचे वारे सुरू झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) अनेक बदलांची तयारी केली जात आहे. नुकतीच १२ जानेवारीला मुंबईत विशेष सर्वसाधारण सभा (SGM) बोलावण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा म्हणजे सचिव आणि खजिनदार पदाची निवडणूक हा आहे.
जय शाह यांच्या जागी देवजीत सैकिया यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत या पदावर राहतील. तर कोषाध्यक्ष अरुण धुमल यांचे दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
टेलिग्राफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत गौतम गंभीर आणि त्याच्या हेड कोचपदाच्या कामगिरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीचा हा प्राथमिक मुद्दा नसला तरी अलीकडची कामगिरी पाहता गंभीरच्या कोचिंगबाबत बोर्डातील काही सदस्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
विशेष म्हणजे, भारताचा नुकताच बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये १-३ असा पराभव झाला आहे. त्यामुळे टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
गौतम गंभीरसाठी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ त्याच्या कार्यकाळातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, तर त्याच्या कोचिंगवर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
खराब फॉर्म आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती ही टीम इंडियाच्या अलीकडच्या अपयशामागील प्रमुख कारणे आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे गोलंदाजी कमकुवत झाली आहे.
टीम इंडियाने राहुल द्रविडच्या कार्यकाळात टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकला. यासह द्रविडचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानंतर गौतम गंभीरने सप्टेंबर २०२४ मध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी भारत कसोटी आणि वनडेमध्येही मजबूत स्थितीत होता. बांगलादेशला कसोटीत २-० ने पराभूत करून गंभीरने प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू केला. मात्र यानंतर संघाची कामगिरी घसरत गेली.
टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ ने पराभव पत्करावा लागला. हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्येही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
संबंधित बातम्या