BCCI On Rohit Sharma Retirement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये रोहित शर्मा अतिशय वाईट फॉर्ममध्ये दिसला आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
खराब फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा निवृत्त होणार, अशी बरीच चर्चा सुरू आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचे अनेक दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहेत. आता भारतीय कर्णधाराच्या निवृत्तीवर बीसीसीआयने मौन सोडले आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "रोहितसोबत निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व निराधार अफवा आहेत आणि आम्ही अफवांवर भाष्य करत नाही."
तो कठीण काळातून जात आहे पण त्याने निवृत्ती घ्यायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही रोहितकडून याबद्दल काहीही ऐकले नाही. आम्ही कसोटी सामन्याच्या मध्यभागी आहोत आणि आमचे लक्ष कसोटी जिंकण्यावर आहे.”
रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्या शेवटच्या १० कसोटी डावांवर नजर टाकली तर त्यात फक्त एकच अर्धशतक दिसून येते. मागील १० कसोटी डावांमध्ये रोहितने अनुक्रमे ३, १०, ६, ३, ११, १८, ८, ०, ५२ आणि २ धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित केवळ ३ धावा करून बाद झाला.
रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ६६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ११४ डावांमध्ये त्याने ४१.२४ च्या सरासरीने ४२८९ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या २१२ धावा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोहितने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.
संबंधित बातम्या