काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाचे अंतरिम प्रशिक्षक आकिब जावेद जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर टोमणे मारताना दिसला होता. त्यानंतर काही दिवसांनी एका कार्यक्रमात एका पाकिस्तानी चाहत्याने एका टीव्ही शोमध्ये ट्रॅव्हिस हेडचे नाव घेऊन रोहित शर्माला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
पण आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वादळी शतक झळकावले. रोहित शर्माने त्याचे ३२ वे वनडे शतक झळकावून चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान संघ आणि इंतर संघासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ आणि टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आपल्या विध्वंसक फलंदाजीने गोलंदाजांची धुलाई करणारा हिटमॅन त्याच्या जुन्या अवतारात परतला आहे. कटकमधील बाराबती स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने चौकार आणि षटकारांसह भरपूर मनोरंजन केले.
सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. कर्णधार फॉर्मात नसताना तो नेतृत्व कसे करणार असे म्हणत टीकाकार ट्रोल करत होते, पण रोहितने आपल्या दमदार फलंदाजीने दाखवून दिले की तो अद्याप संपलेला नाही, त्याच्यात आणखी क्रिकेट शिल्लक आहे.
डावाची सुरुवात करताना रोहितने डावाच्या दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला आणि तो आता फॉर्मात आल्याचे स्पष्ट झाले. बॅटचा जबरदस्त फ्लो आणि चेंडू बॅटवर आदळल्यानंतर येणारा आवाज यामुळे त्याच्या फॉर्मात येण्यावर शिक्कामोर्तब झाले.
यानंतर त्याने पाकिस्तानी वंशाचा वेगवान गोलंदाज साकीब महमूदला दोन षटकार आणि एक चौकार मारले. यानंतर आदिल रशीद आणि मार्क वुड हे रोहित शर्माचे पुढचे टार्गेट ठरले. हिटमॅनने कोणालाही सोडले नाही.
विध्वंसक फलंदाजीदरम्यान, रोहितने महान सचिन तेंडुलकर आणि ख्रिस गेल यांचे अनेक विक्रम मोडीत काढले . २६व्या षटकात रोहित शर्माने आदिल रशीदला लाँग ऑफवर षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले.
बीसीसीआयने X वर त्याच्या शतकाचा आणि सेलिब्रेशनचा ४२ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आपले शतक पूर्ण करताच संपूर्ण स्टेडियम त्याच्या स्वागतासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर रोहित फॉर्मात आला आहे. अशा स्थितीत शेजारील देश पाकिस्तान आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणारे संघ दबावात असतील. रोहितने त्यांच्याविरुद्ध फलंदाजी केली तर मोठी धावसंख्या होऊ शकते आणि कोणतेही लक्ष्य सुरक्षित राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. भारताने ३०५ धावांचे लक्ष्य अवघ्या ४४ षटकात पूर्ण केले. रोहितने ९० चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी खेळली.
संबंधित बातम्या