Amit Mishra allegation: भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांची गणना जगातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीने ते केले जे जगातील इतर कोणत्याही कर्णधाराला जमले नाही. धोनीने आपल्या कारकिर्दीत आयसीसीच्या तिन्ही प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, कोहली कसोटीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी- विराटच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्त्वाखाली अनेक खेळाडूंनी पदार्पण केले आणि कारकीर्दही संपवली. परंतु, भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने धोनी- कोहलीच्या नेतृत्वाखाली हवी तशी संधी मिळाली नाही, असा आरोप केला आहे.
अमित मिश्राने भारतासाठी खेळताना २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी-२० सामन्यात एकूण १५६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली नाही. शुभंकर मिश्राच्या यूट्यूब शो 'अनप्लग्ड'मध्ये बोलताना अमित मिश्राने आपले दुख: व्यक्त केले. २०१० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स आणि अर्धशतक झळकावून त्याला पुढील सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. अमित मिश्रा म्हणाला की, "संघात जागा मिळवण्यासाठी नुसते चांगले क्रिकेट खेळणे पुरेसे नाही. एमएस धोनीसोबत माझे चांगले संबंध होते. मी त्याला दोनदा विचारले की, माझी निवड का होत नाही? त्याने मला सांगितले की, मी कॉम्बिनेशनमध्ये फिट बसत नाही.
“मला विश्रांती दिली जात असल्याचे सांगण्यात आले. मी १० कसोटी सामनेही खेळलो नव्हतो, मग मी विश्रांती का मागणार? जर मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी धोनीला प्रश्न विचारण्याच्या स्थितीत नव्हतो. मी प्रशिक्षकांना विचारले आणि त्यांनी मला धोनीला विचारण्यास सांगितले. परंतु, मी म्हटल्याप्रमाणे मी धोनीला जाऊन विचारण्याच्या स्थितीत नव्हतो. मी पुन्हा प्रशिक्षकाला विचारले आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला विश्रांती देत आहोत.”
मिश्राला विराट कोहलीकडूनही स्पष्टता मिळाली नाही, मिश्राने २०११ पर्यंत खूप कमी कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान, २०१४ मध्ये बांगलादेशात झालेल्या टी-२० विश्वचषकात तो खेळला. यानंतर धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि विराट कोहली भारताचा पुढील कर्णधार बनला. मात्र, तरीही मिश्राला संघात जागा मिळाली नाही. मिश्राला धोनीकडून स्पष्ट उत्तर मिळाले नाही आणि कोहलीनेही त्याला कोंडीत ठेवले. २०१५-२०१६ च्या मोसमात मिश्राने कोहलीच्या नेतृत्वाखाली शेवटचे नऊ कसोटी सामने खेळले होते. परंतु, चांगली कामगिरी करता न आल्याने तो पुन्हा संघाबाहेर पडला.
अमित मिश्रा पुढे म्हणाला की “पाच वर्षांपूर्वी गुडघ्याला दुखापत झाली तेव्हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट अनुभव आला. प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना दुखापत झाली तरी त्या खेळाडूचे आपोआप पुनरागमन केले जाते. रिद्धिमान साहा, अनिल कुंबळे आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत असे घडले. पण माझ्यासोबत असे झाले नाही.”
“आयपीएलदरम्यान आमचा शेवटचा सामना आरसीबीविरुद्ध होता. मी विराटला माझ्या कारकिर्दीबद्दल स्पष्ट उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला 'मिशी भाई, मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो'. श्रीलंकेविरुद्धच्या पुनरागमन मालिकेत विराट कोहलीने मला मदत केली. मी चांगली कामगिरी करत होतो आणि भारताला श्रीलंकेत गोलंदाजी करू शकणाऱ्या लेग स्पिनरची गरज होती.”
संबंधित बातम्या