वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. जोसेफ आणि कर्णधार शाय होप यांच्यात भर मैदानात सामन्यादरम्यान वाद झाला होता. यानंतर जोसेफ रागाच्या भरात सामना सोडून पव्हेलियनमध्ये निघून गेला.
वास्तविक, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (६ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यातील इंग्लंडच्या डावाच्या चौथ्या षटकात होप आणि जोसेफ यांच्यात वाद झाला.
अल्झारी जोसेफ कर्णधार शाय होपने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर खूश नव्हता. जोसेफने सांगितल्यानंतरही कर्णधाराने क्षेत्ररक्षणात बदल केला नाही. त्यामुळे तो संतापला. रागाच्या भरात अल्झारीने वेगवान गोलंदाजी सुरू केली आणि या षटकात विकेट घेऊन एकही धाव दिली नाही. ओव्हर संपताच तो मैदान सोडून बाहेर पडला.
तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात अल्झारी जोसेफ रागाच्या भरात मैदान सोडून गेला. अशा तऱ्हेने संघाला काही काळ १० खेळाडूंसह क्षेत्ररक्षण करावे लागले. मात्र, काही वेळाने जोसेफ माघारी परतला आणि त्याने आपला १० षटकांचा कोटा पूर्ण केला. पण जोसेफच्या या कृतीमुळे संतापलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर बंदी घातली आहे, जेणेकरून युवा क्रिकेटपटूंनाही यातून धडा घेता येईल.
दरम्यान, सीडब्ल्यूआयच्या एका निवेदनात जोसेफ म्हणाला की, "माझा विश्वास आहे की माझ्या पॅशनने मला सर्वोत्तम बनवले. "मी वैयक्तिकरित्या कर्णधार शाई होप, माझे सहकारी आणि व्यवस्थापनाची माफी मागितली आहे. वेस्ट इंडिजच्या चाहत्यांची ही मी मनापासून माफी मागू इच्छितो. मला समजले आहे की निर्णयातील थोड्याशा त्रुटीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि मला झालेल्या कोणत्याही निराशेबद्दल मला खेद आहे. "
वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी जोसेफची कृती अमान्य असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. जोसेफ यांचे वर्तन अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगत बोर्डाने शुक्रवारी याच भावनेचा पुनरुच्चार केला.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे संचालक माईल्स बासकॉम्ब म्हणाले की, "अशा प्रकारच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि आम्ही परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे स्वीकारण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडिजने शेवटचा एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकून मालिका २-१ अशी जिंकली.
संबंधित बातम्या