भारत आणि ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे. आज (१७ डिसेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात भारताने दमदार खेळ दाखवला. जसप्रीत बुमराह आणि आकाशदी यांनी १०व्या विकेटसाठी झुंजार भागिदारी करत फॉलोऑन टाळला.
गाबा कसोटीत आकाश दीप ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तो जेव्हा क्रिजवर आला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या ९ विकेटवर २१३ धावा होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला २४६ धावा कराव्या लागणार होत्या. येथून आकाश दीपने बुमराहससोबत सावध फलंदाजी करत टीम इंडियाला २४६ धावांपर्यंत नेले.
आकाश दीप क्रीजवर जास्त काळ शांत राहण्यासाठी ओळखला जात नाही. तो येताच चेंडू उडवण्याचा प्रयत्न करतो. पण फॉलोऑन वाचवण्यासाठी त्याने संयमाने फलंदाजी केली.
फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २४६ धावा करायच्या होत्या. पण भारताची धावसंख्या २४२ धावा झाली असताना आकाश दीपने चौकार मारून काम पूर्ण केले. भारताचे फॉलोऑन टळताच ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ खेळाडूंनी जल्लोष केला.
भारतावरचे फॉलोऑन टळताच आकाश दीपवरील दडपण संपले. यानंतर त्याच षटकातील पुढच्या चेंडूवर त्याने कर्णधार पॅट कमिन्सला मिड-विकेटला षटकार ठोकला. हा चेंडू थेट प्रेक्षकांच्या मधोमध पडला.
बराच काळ शांत राहिलेल्या आकाश दीपचा हा अचानक आलेला उत्तुंग षटकार पाहून ड्रेसिंग रूममधील खेळाडू आश्चर्यचकित झाले. विराट तर हा षटकार पाहण्यासाठी ड्रेसिंग रूमच्या बाहेर आला. आकाशदीपचा हा षटकार पाहून सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली.
विशेष म्हणजे, आकाश दीप विराट कोहलीच्या बॅटने खेळत होता. काही दिवसांपूर्वीच विराटने गोलंदाज आकाश दीपला त्याची बॅट भेट दिली होती.
केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना अनिर्णितकडे वळताना दिसत आहे. जडेजाने १२३ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावा केल्या. तर राहुल ८४ धावा करून बाद झाला, त्याने १३९ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार लगावले.
खराब प्रकाशामुळे खेळ लवकर रद्द करण्यात आला तोपर्यंत भारताने ९ गडी गमावून २५२ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह १० आणि आकाश दीप २७ धावांसह खेळत आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या १९३ धावांनी मागे आहे
संबंधित बातम्या