Narendra Modi tweet on deepinder goyal video : ‘आजच्या भारतात एखाद्याचं आडनाव काय आहे यानं फरक पडत नाही. आज देशात महत्त्व कशाला असेल तर ते कठोर परिश्रमाला आहे’
हे उद्गार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या वाटचालीची माहिती देणारी एक पोस्ट नुकतीच केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी शेअर केली होती. ही पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी शेअर केली असून गोयल यांचं कौतुक केलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, दीपंदर गोयल! तुमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. असंख्य तरुणांना त्यांच्या उद्योजकीय स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यातून प्रेरणा मिळेल. देशात अधिकाधिक स्टार्टअप्स सुरू व्हावेत आणि त्यासाठी योग्य वातावरण मिळावं यासाठी कटिबद्ध आहोत, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
पुरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये झोमॅटोचे दीपिंदर गोयल त्यांचा अनुभव सांगताना दिसत आहेत. ते म्हणतात की, २००८ मध्ये जेव्हा त्यांनी झोमॅटो सुरू केली, तेव्हा त्यांचे वडील म्हणाले होते की, "तुला माहीत आहे का की तुझे वडील कोण आहेत? आपल्यासारख्या लोकांनी या सगळ्यात पडू नये असं त्यांना सुचवायचं होतं असं दीपिंदर गोयल सांगतात.
केंद्र सरकारच्या या उपक्रमाचं कौतुक करताना ते म्हणाले, "मी पंजाबमधील एका छोट्या शहरातून आलो आहे, पण गेल्या १६ वर्षांत खूप काही बदललं आहे असं वाटतं, विशेषत: गेल्या ७ ते १० वर्षांत खूपच फरक पडला आहे, असं गोयल व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते हरदीप सिंग पुरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी ‘विशेष संपर्क अभियान’ कार्यक्रमात विविध व्यावसायिकांनी सहभाग घेतला आणिआपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमानं आघाडीचे IT व्यावसायिक, नवोदित, स्टार्टअप नेते आणि विचारवंतांना मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील डिजिटल परिवर्तन आणि भविष्यातील संभावनांविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र आणलं.
डिक्सन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन सुनील वाचानी यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी एका दशकापूर्वी जवळपास १०० टक्के मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स आयात करत होती आणि आता ती जवळपास सर्वच इथं बनवत आहे. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळं ते लवकरच १०० अब्ज अमेरिकी डॉलर किमतीचे मोबाइल फोन निर्यात करतील.
वाचानी यांच्या अनुभवावर देखील पीएम मोदी यांनी ट्विट केलं आहे. ‘मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. भारतातील मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील परिवर्तन खरोखरच उल्लेखनीय आहे. हे भारताच्या क्षमतेचं आणि गेल्या काही वर्षांत उचललेल्या सक्रिय पाऊलांचा पुरावा आहे.’
संबंधित बातम्या