पुढील वर्षापासून टाटा मोटर्स छोट्या डिझेल कारचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारिख यांनी ही माहिती दिली. देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीने १ एप्रिल २०२० पासून आपल्या सर्व प्रकारच्या डिझेल वाहनांचे उत्पादन बंद करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
पारिख म्हणाले, बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेलच्या छोट्या तसेच मध्यम कार महाग होतील. या कारच्या मागणीचा विचार करता या प्रकारच्या पेट्रोल कारलाच अधिक मागणी आहे. भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-६ प्रदूषण मानक लागू होत असून यामुळे अनेक कंपन्यांच्या डिझेल वाहनांमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे या कार महाग होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर अशा कारची मागणीही कमी होऊ शकते.