Ratan Tata Message on voting : देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा, पाचवा टप्पा सोमवार, २० मे रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात याच टप्प्यात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईकरांसाठी खास संदेश दिला आहे. सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला घटनात्मक हक्क बजावावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
रतन टाटा यांनी ‘एक्स’वरील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा संदेश शेअर केला आहे. 'मुंबईत सोमवारी मतदानाचा दिवस आहे. सर्व मुंबईकरांनी जबाबदारीनं मतदान करावं, असं आवाहन रतन टाटा यांनी केलं आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी सकाळी सात वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे.
अवघ्या एका तासापूर्वी शेअर करण्यात आलेली ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. आत्तापर्यंत याला ३० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या झपाट्यानं वाढत आहे. या पोस्टला जवळपास ३,८०० लाइक्स मिळाले आहेत. या शेअरवर प्रतिक्रिया देताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
'खूप खूप प्रेम, सर… असं एका एक्स युजरनं म्हटलं आहे.
सर्व मुंबईकर आपल्या मताधिकाराचा वापर स्थैर्य, समृद्धी आणि समानतेसाठी करतात.
‘भारत खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखा माणूस या देशाला मिळाला, सर’,
मुंबईच्या जनतेला तुम्ही केलेलं आवाहन हे देशहिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकजण देशाच्या कल्याणात योगदान देईल हीच आशा आहे,' अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरनं दिली आहे.
"जबाबदारी लक्षात ठेवा," असं एका युजरनं रतन टाटा यांच्या पोस्टला प्रतिसाद देताना म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील ठराविक जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
मुंबई व ठाण्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार चुरस आहे. मुंबईत शिंदे सेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत तीन जागांवर सरळ लढत आहे. तर, काँग्रेस दोन जागा लढवत आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका जागेवर समोरासमोर आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यापैकी ठाणे व कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे सेनेत लढत आहे. तर, भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये लढत आहे.
संबंधित बातम्या