दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे असलेल्या एअर इंडियाची इमारत आजपासून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत ताब्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मालकीची ही २३ मजली इमारत राज्य सरकारने १६०१ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या इमारतीचे हस्तांतर करण्यास केंद्र सरकारने आज, गुरुवारी मंजुरी दिली आहे. इमारतीची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी’कडे असलेली २९८.४२ कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारने माफ केल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिव तुहिन कांत पांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान २०१८ पासून ही इमारत विकत घेण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. सुरुवातीला या इमारतीची किंमत दोन हजार कोटी रुपये सांगण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारने १४५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाने नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता.