वैदिक शास्त्रानुसार ज्योतिष अभ्यासात ग्रह-नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये शनि ग्रहाला सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक समजले जाते. शनि देव राशीचक्रातील प्रत्येक राशीवर शुभ-अशुभ प्रभाव पाडत असतात. एखाद्या व्यक्तीवर शनी देव प्रसन्न असतील तर त्यांचे नशीब अक्षरशः चमकते. मात्र याउलट शनी देव एखाद्या राशीवर अशुभ प्रभाव टाकत असतील तर त्या व्यक्तीला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शनी देवाचा प्रकोप ओळखून वेळीच उपाय करणे गरजेचे असते.
शनी दोष दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यापैकीच एक उपाय रत्नशास्त्रामध्येसुद्धा सूचित करण्यात आला आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या विविध ग्रहदोषांना दूर करण्यासाठी रत्न शास्त्रात विविध रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जोतिषांच्या सल्ल्यानुसार हे रत्न धारण केल्यास त्या व्यक्तीला अडचणींपासून सुटका होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला शनीदोष दूर करण्यासाठी कोणते रत्न धारण करावे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
रत्न शास्त्रात शनीदोष दूर करण्यासाठी नीलम हे रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शास्त्रानुसार हे रत्न अत्यंत शक्तिशाली असते. हे रत्न धारण केल्यास शनीदोष दूर होण्यास मदत होते. नीलमच्या प्रभावाने कुंडलीतील शनीचा अशुभ प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. परंतु नीलम हे रत्न अतिशय महाग असल्याने बहुतांश लोकांना ते खरेदी करणे सोयीस्कर होत नाही. त्यामुळे रत्नशास्त्रात नीलम रत्नाला एक पर्यायी रत्न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पर्यायी रत्नाला जमुनी अथवा एमेथिस्ट क्रिस्टल असे म्हटले जाते. हे रत्न धारण केल्यानेसुद्धा शनीदेव प्रभावित होतात. आणि त्यामुळे शनी देवाच्या प्रकोपातून मुक्ती मिळते. जमुनी हे रत्न जांभळ्या रंगाचे असते. आयुष्यातील दुःख आणि अडचणी दूर करण्याचे गुणधर्म यामध्ये असतात.
रत्न शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी एमेथिस्ट रत्न धारण करणे लाभदायक आणि शुभ असते. मात्र हे रत्न धारण करण्यापूर्वी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या गंगाजलमध्ये त्याचे शुद्धीकरण करावे. तसेच शनिवारच्या दिवशी शनी देवाची मनोभावाने आराधना करावी. यामध्ये शनिदेवाचे बीज मंत्र ''ऊँ शं शनैश्चराय नमः'' चे १०८ वेळा जप करावे. त्यानंतर हाताच्या मधल्या बोटात ही अंगठी धारण करावी. जोतिष शास्त्रातील या पद्धतीने ही अंगठी धारण केल्यास, शनी देवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. आणि शनी देवाची शुभ कृपादृष्टी निर्माण होते. त्यामुळे आयुष्यातील अडचणी आणि दुःख दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते.
रत्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील. प्रचंड कष्ट करूनसुद्धा हवे तसे यश पदरात पडत नसेल. तर हे रत्न धारण करणे फायद्याचे ठरते. हे रत्न धारण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच नोकरी-व्यवसायातील प्रगती मार्गात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या रत्नाचा उपयोग होतो. हे रत्न धारण केल्यास शनिदोष दूर होऊन आयुष्यात शुभ प्रभाव दिसू लागतो.
संबंधित बातम्या