Khawaja on Kapil: ICC च्या पोस्टवर उस्मान ख्वाजाने उडवली कपिल देव यांची खिल्ली
माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी विराटवर टीका केली होती. विराटऐवजी आता युवा खेळाडूंना संघात आजमावण्याची वेळ आली आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले होते.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) सध्या वाईट काळातून जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात एका नवख्या गोलंदाजाने कोहलीची विकेट घेतली. या सामन्यातही विराट अपयशी ठरल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनीही विराटवर टीका केली होती. विराटऐवजी आता युवा खेळाडूंना संघात आजमावण्याची वेळ आली आहे, असे मत कपिल देव (kapil dev) यांनी व्यक्त केले होते.
ICC ने कपिल देव यांचे ते वक्तव्य इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, त्यावर आता ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) कमेंट केली आहे, ती आता व्हायरल झाली आहे.
ICC ने कपिल देव यांचे ते वक्तव्य शेअर केले आहे, ज्यात लिहिले आहे की, 'जर तुमच्याकडे खूप पर्याय उपलब्ध असतील तर फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही केवळ नावाच्या आधारे खेळाडूंची निवड करु शकत नाही, तर तुम्हाला त्याचा फॉर्मही पाहावा लागेल. तुम्ही संघाचे कायमस्वरूपी खेळाडू असू शकता, पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही सतत अपयशी होऊन सुद्धा संघात राहाल".
आयसीसीच्या या पोस्टवर उस्मान ख्वाजा याने कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, १४० च्या स्ट्राइक रेटवर ५० ची सरासरी ही चांगली गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया याला सहमत आहे.
दरम्यान, विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीतील दोन्ही डावात मिळून ३१ धावा केल्या होत्या. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यातही विराट फ्लॉप ठरला. त्याने दोन सामन्यात मिळून १२ धावा केल्या आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही.